आमदारांनी विनापरवानगी बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी हटवला

आमदारांनी विनापरवानगी बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी हटवला

अमरावती: (प्रतिनिधी) राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा  यांनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज  यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनानं आज पहाटे प्रचंड

पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. काल, रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले व  नंतर हा पुतळा काढण्यात आला.हा पुतळा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलंय. तर, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जिल्ह्यात राजकारण तापलं

रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी 2 दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिवप्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते.

भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची प्रतिक्रिया

अमरावती येथील उड्डाणपूलावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्री पोलिसांनी हटवला. त्यामुळे यात राजकीय वातावरण तापले असून भाजपने देखील यात उडी घेतली आहे.भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. जनभावनेचा अनादर या मोगलाई सरकारने केला असा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला. तर, हिंदूच्या भावना शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर दुखावल्या गेल्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला व पुतळा हटवला, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.