पोलीस झोपलेले आहेत की गाडीखाली गेलेत?" – महमूद दरवाज्यावरील ट्राफिक कोंडीची २४ तासांची लाजीरवाणी कहाणी!

छत्रपती संभाजीनगर, १६ जून : महमूद दरवाजा, पाणचक्की परिसर आता ट्राफिक जामचा अखंड गडद धूर बनला आहे. ‘मकाई गेट’च्या बंद दरवाज्याने शहरवासीयांच्या संयमाचा बंद दरवाजा उघडून टाकला आहे.
या एकाच रस्त्यावर आता शहरातील हजारो वाहनं रांग लावून उभी! अगदी कार्यालयीन वेळ असो, आपत्कालीन रुग्णवाहिका असो वा बाहेरून आलेले पर्यटक – सर्व जण एका गोष्टीचे बळी ठरत आहेत... आणि ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या वाहतूक नियंत्रण विभागाची बेशिस्त, बेजबाबदार आणि बेजबाबदारीची कार्यसंस्कृती!
दिवसाचे कुठलेही प्रहर असो, महमूद दरवाजा आता ट्राफिकमध्ये ‘गुदमरतो’ आहे. रुग्णवाहिकांना वेळेत घाटी रुग्णालयात पोहोचता येत नाही, नागरिक आपल्या वेळेवर पोहोचू शकत नाहीत, शेकडो विद्यार्थी-वेतनदार दररोज ‘वाहतूक परीक्षा’ देत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – वाहतूक नियंत्रण विभाग मात्र आपल्या ‘आराम खुर्चीत’ निवांत आहे!
वाहतूक शाखेचे पोलीस नेमके करतात तरी काय?
वाहतूक नियंत्रण हे पोलीस विभागाचे मूलभूत कर्तव्य असताना, महमूद दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना एकही पोलीस कर्मचारी दिसत नाही. पोलीस उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक, शाखा... सगळे कुठे आहेत? हे ‘प्रशासन’ आहे की ‘मूकदर्शक संघ’?
कायद्याचा पुस्तकी दाखला – पण कर्तव्यात ठनक शून्य!
महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार वाहतूक नियंत्रण हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य आहे. पण संभाजीनगरच्या वाहतूक शाखेसाठी हे कर्तव्य नव्हे, तर बहुधा ‘पर्यायी सेवा’ आहे. एका विभागात ४-५ वाहतूक शाखा, वरून पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त... पण कार्यक्षमता कुठे? जनतेचा त्रास आणि अपघातांची शक्यता यांकडे सरळ दुर्लक्ष केलं जातं आहे.
"रस्त्यावर पोलीस नाहीत, पण कागदोपत्री कार्यवाही मात्र तुफान!"
काही गडबड झाली की अहवाल, प्रेस नोट्स, आकडेवारी, ‘चार पावले पुढे सरसावली’ हे दाखवले जाते. पण प्रत्यक्षात रस्त्यावर कोणतंही नियंत्रण नाही.
एखाद्याला धक्का लागतो, गाड्या एकमेकांवर आदळतात, आणि मग सुरू होतात नेहमीची गलका, भांडणं, शिव्यांची बरसात.
"पोलीस आयुक्त, एकदा या रस्त्यावर स्वतःच्या गाडीने जा!"
जनतेची एकच मागणी आहे – पोलीस आयुक्तांनी स्वतः या महमूद दरवाज्याची आणि पाणचक्की परिसराची पाहणी करावी.
त्या वेळी कदाचित कळेल – कंपाउंडमधल्या एसी ऑफिसच्या बाहेर, रस्त्यावरचा खरा ताप काय असतो!
शेवटी प्रश्न एकच – ट्राफिक पोलीस नेमके करतात तरी काय? शिस्तीत नागरिकांना दंड करणे, व्हीआयपी रूट साफ ठेवणे आणि सामान्यांना झिडकारणे हेच जर कर्तव्य असेल, तर 'वाहतूक नियंत्रण शाखा' हे नाव बदलून 'वाहतूक अडथळा शाखा' असं ठेवावं लागेल!