जास्त बुलेट प्रूफ, कमी रिपोर्टिंग – गोदी मीडियाचा युद्धप्रेमाचा तमाशा!

एकेकाळी पत्रकारिता म्हणजं सत्याच्या शोधात चाललेली धाडसी वाटचाल होती. पण आजच्या काळात काही मीडियावाले ‘धाडस’ म्हणजे बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि कॅमेऱ्यासमोर कमांडो थाटात उभं राहणं इतकंच मानतात. आणि हो, हे सगळं करताना – "मी इथे आहे... तुमच्यासाठी... थेट युद्धभूमीतून!" असा नाट्यमय संवाद ठरलेलाच असतो.
आता तुम्हाला आठवत असेलच, इसराइल-हमास संघर्ष सुरू झाला तेव्हा आपल्या देशातील काही खास मीडियाचे रिपोर्टर म्हणजे काय थेट ‘रॉ’ एजंट समजावेत इतक्या थाटात इसराइलमध्ये उड्या मारून रिपोर्टिंग करत होते. बॅकग्राउंडला सायरन, कधी गडद आकाशात उडणारे क्षेपणास्त्र, आणि मधे हे "युद्धविशारद रिपोर्टर" – असं दृश्य पाहून वाटायचं CNN पण लाजेल!
पण...इराण-इसराइल संघर्ष सुरू झाल्यावर हेच रिपोर्टर कुठे गेले? "ग्राउंड रिपोर्टिंग"चा गाजावाजा करणारे चेहरे आता स्टुडिओमध्ये बसून मोठ्या आवाजात, अंगविक्षेप करत, इतर देशांच्या फुटेजवर बोट ठेवत "आम्हीच पहिले होतो!" असं सांगताना दिसतात. म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट आता कपाटात गेला आणि 'डिबेट जॅकेट' परत अंगावर चढलं.
आता प्रश्न पडतो – जेव्हा परिस्थिती खरंच धोकादायक झाली, जेव्हा इसराइलवर इराणने थेट मिसाईल्सचा पाऊस पाडला, तेव्हा "आपले रिपोर्टर" कुठे गेले? त्या थरारक क्षणांना ग्राउंडवर न राहता त्यांनी चहा प्यायचा कप घेतला आणि थेट न्यूजरूममध्ये पोहोचले.
कदाचित त्यांचं युद्धग्रस्त भागात जाण्याचं शौर्य हे फक्त निवडक युद्धांपुरतंच मर्यादित असावं. म्हणजे जिथे सरकारची भूमिका एकांगी असते, तिथे ते 'नायक' होतात. पण जिथे समीकरणं गुंतागुंतीची असतात, तिथे मात्र ते 'दर्शक' बनतात.
एक गोष्ट लक्षात घ्या – आजकालच्या गोदी मीडिया रिपोर्टिंगमध्ये एक नवा ट्रेंड आलाय – "वॉर टुरिझम". म्हणजे युद्धभूमीत जाऊन थोडं रिपोर्टिंग करायचं, सोशल मीडियावर फोटो टाकायचे, "मी इथे होतो" असं सांगायचं, आणि मग परत आल्यानंतर वर्षभर तेच फुटेज टाकत रहायचं.
हे सगळं पाहून प्रश्न पडतो – हे खऱ्या अर्थानं पत्रकार आहेत की "इंस्टावॉर इन्फ्लुएंसर्स"?
इराण-इसराइल संघर्षात सध्या सगळी माहिती परदेशी एजन्सीकडून, स्थानिक मिडियातून किंवा ट्विटरवरील अकाउंट्सकडून मिळत आहे. पण आपले टीव्ही रिपोर्टर मात्र त्याचं भांडवल करून जोरजोराने 'ब्रेकिंग न्यूज' ओरडत आहेत – जणू त्यांच्यामुळेच युद्ध सुरू झालं!
जिथे प्रत्यक्ष जाऊन वास्तव समजून घ्यायचं असतं, तिथे हे रिपोर्टर केवळ स्टुडिओत "आमच्या एक्सक्लुझिव्ह सूत्रांनुसार..." असं म्हणत, दुसऱ्याच्या बातम्या आपल्याच समजून सांगत राहतात.
आणि हो, जर तुम्ही या तथाकथित रिपोर्टिंगवर प्रश्न विचारलात, तर तुमच्यावर लगेच देशद्रोहाची छाया येते. तुम्ही म्हणाल, “अहो, ग्राउंडवर जा की!” – तर उत्तर मिळेल, "तुम्हाला भारताची काळजी नाही, आम्हाला आहे!" म्हणजे टीका केली की देशद्रोही, पण निवडक युद्धात फोटो काढले की देशभक्त?
बुलेटप्रूफ जॅकेट घालून उभं राहणं हे धाडसाचं प्रतीक नाही, तर सत्याची भीती न बाळगता कुठल्याही परिस्थितीत तटस्थ आणि निर्भीड पत्रकारिता करणं हेच खरं धाडस आहे.
आज गरज आहे त्या पत्रकारांची जे सरकार, पक्ष, धर्म वा युद्ध कसलंही बंधन न पाळता फक्त सत्यासाठी लढतात. पण ते सध्या दिसत नाहीत. दिसतात फक्त – ओरडणारे, नाटक करणारे, आणि इतरांच्या बातम्यांतून आपलं 'ब्रँड' विकणारे.
म्हणून शेवटी एवढंच म्हणावं लागतं: “हे युद्धावरचे रिपोर्टर नव्हेत, हे ‘युद्धावरचे कलाकार’ आहेत – स्क्रिप्ट दुसऱ्याची, आणि संवाद स्वतःचे!”
डॉ. रियाज़ देशमुख, एसीपी (रि), छत्रपती संभाजीनगर.