सिद्धार्थ उद्यानात गेट कोसळून मृत्यू : डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर, १३ जून २०२५ :
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (मनपा) सिद्धार्थ उद्यानात ११ जून रोजी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत उद्यानाचे सिमेंटचे मुख्य प्रवेशद्वार अचानक कोसळले. त्यामुळे दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आणि एकजण गंभीर जखमी झाला, तर चार जण किरकोळ जखमी झाले.
या घटनेबाबत पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचिव डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, दोषी कंत्राटदार, संबंधित अभियंते आणि वास्तूला ‘योग्यता प्रमाणपत्र’ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आणि स्वतंत्र तज्ज्ञांची चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी.
दुर्घटनेचा तपशील:
११ जून रोजी सायंकाळी वादळासह जोरदार वारे वाहत असताना सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य गेटजवळ पर्यटक, स्थानिक विक्रेते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी अचानक सिमेंटचा जड दरवाजा कोसळला. गेट थेट पर्यटकांवर आणि विक्रेत्यांवर आदळला.
यात स्वाती अमोल खैरनार (३७), रा. रांजणगाव शेणपुंजी आणि रेखा हरिभाऊ गायकवाड (६५), रा. गजानननगर, हडको या दोघींचा जागीच मृत्यू झाला.
शेख अकील रहीम नावाचा युवक गंभीर जखमी असून सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आणखी चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
डॉ. दाते-पाटील यांची मागणी:
डॉ. राजेंद्र दाते-पाटील यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की;
• निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेले कंत्राटदार, वास्तू निरीक्षक व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
• ज्यांनी याला मंजुरी दिली, त्यांनी कोणत्या निकषांवर 'स्ट्रक्चरल फिटनेस' प्रमाणपत्र दिले, याची चौकशी व्हावी.
• दुर्घटना ही मनपाच्या व्यवस्थेतील निष्काळजीपणाचे फलित आहे.
• या प्रकरणात गुन्हे दाखल करून तातडीने अटकेची कारवाई करावी.
आणखी काही महत्वाच्या मागण्या:
¶ दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना किमान १० लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी.
¶ मनपाच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची सुरक्षितता तपासावी.
¶ सिद्धार्थ उद्यानात तसेच मनपाच्या प्राणी संग्रहालयात सध्या योग्य शिक्षण व अनुभव असलेले पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे तिथे उच्च शिक्षित आणि अनुभवी डॉक्टर (सर्जन) यांची नियुक्ती तात्काळ करावी.
डॉ. दाते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सर्व मागणी लेखी निवेदनाद्वारे मांडली असून, या प्रकरणात दिरंगाई केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
टीप: ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविशष्यात अशा घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने तत्काळ जबाबदारीची जाणीव ठेवून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.