ईदला मौन, हिंदू सणांना वंदन – संभाजीनगर शहर पोलिसांचा धार्मिक 'सेलेक्टिव्ह' सलाम

ईदला मौन, हिंदू सणांना वंदन – संभाजीनगर शहर पोलिसांचा धार्मिक 'सेलेक्टिव्ह' सलाम
Official facebook page of Chhatrapati Sambhajinagar City Police

           छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाकडून धार्मिक विविधतेचा सन्मान केला जातो असा एक सार्वत्रिक समज होता. परंतु ८ जून २०२५ रोजी साजऱ्या झालेल्या ईद-उल-अज़हा च्या निमित्ताने या पोलीस दलाने जाणीवपूर्वक मौन बाळगले आणि आपल्या वागणुकीतून धर्मनिरपेक्षतेला हरताळ फासला आहे.

          शहर पोलिसांचे अधिकृत फेसबुक पेज 'CP Chhatrapati Sambhajinagar Police' हे  जनतेशी थेट संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. या पेजवर विविध सण-उत्सव, जयंती व पारंपरिक दिवसांच्या शुभेच्छा देत धार्मिक सलोखा दर्शवला जातो. मात्र या वर्षी ईद-उल-अज़हाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा संदेश, फोटो पोस्ट वा शुभेच्छा देण्यात आलेल्या नाहीत — ही केवळ चूक नाही, तर ती एक विचारपूर्वक केलेली उपेक्षा आहे.
गेल्या दोन महिन्यांत त्यांनी दिलेल्या शुभेच्छांची यादी पाहिली तर ती ठळकपणे एकाच विशिष्ट धार्मिक किंवा सांस्कृतिक समूहाभोवती फिरते;

          दिनांक ३ एप्रिल ला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी ला वंदन, ६ एप्रिल ला रामनवमी, ११ एप्रिल ला महात्मा ज्योतिबा फुले जयंती, १२ एप्रिल ला हनुमान जन्मोत्सव, १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २९ एप्रिल ला भगवान परशुराम जयंती, ९ मे रोजी महाराणा प्रताप जयंती, १२ मे रोजी गौतम बुद्ध पौर्णिमा, १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती, २९ मे रोजी महाराणा प्रताप जयंती, ३१ मे ला अहिल्यादेवी होळकर जयंती, ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा, १० जून ला वटपौर्णिमा अशा कार्यक्रमांनिमित्त पोस्ट केल्या गेल्या. ही सर्व ठिकाणी उत्सवांचे कौतुक झाले. पण संपूर्ण शहरात मोठ्या श्रद्धेने आणि शांततेने साजऱ्या झालेल्या ईद उल अज़हा कडे मात्र त्यांनी पाठ फिरवली.

         हा केवळ एक विसर पडलेला भाग नाही. ही मानसिकता, ही भूमिका, ही एक हिंदुत्ववादी आणि मुस्लिमविरोधी पूर्वग्रहदूषित विचारसरणी आहे. वर्षातून दोनच मोठे सण असणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या या सणाचे उल्लेख न करणे म्हणजे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न नव्हे तर काय?
पोलिस हे एका धर्माचे नसतात. पोलीस हे संविधानाचे शिपाई असतात. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि प्रत्येक धर्म, जात, पंथ या संविधानाच्या समान अधिकाराखाली येतात. अशा परिस्थितीत सार्वजनिक संस्थांनी कोणत्याही धर्मीय नागरिकांप्रती दुजाभाव करणे हे निंदनीय आहे.

          म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो — हे पोलीस कोणासाठी काम करत आहेत? संविधानासाठी की संघ-संवेदनशील विचारसरणीसाठी?

          जर पोलीस दल धर्मनिरपेक्षतेचा पाया विसरत असेल, तर सर्वसामान्य जनतेचा विश्वास डळमळीत होणार नाही का? धार्मिक सलोख्याचा कणा मोडत असेल तर समाजात तेढ निर्माण होणार नाही का?
आज गरज आहे ती जाहीरपणे या प्रकाराला विरोध करण्याची. या पक्षपाती वागणुकीविरुद्ध आवाज उठवण्याची. जेणेकरून उद्या कोणताही धर्म किंवा समाज या प्रकारच्या उपेक्षेचा बळी ठरणार नाही.
ईद-उल-अज़हाच्या दिवशी शुभेच्छा न देणं हा केवळ भूल नाही, ती पोलिसांची ‘वृत्ती’ दर्शवणारी गंभीर बाब आहे.

-रियाज़ देशमुख, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस (रिटायर्ड), छत्रपती संभाजी नगर.