नशेच्या धंद्याला पोलिसांचा अभय असल्याचा संशय : खा. इम्तियाज जलील

नशेच्या धंद्याला पोलिसांचा अभय असल्याचा संशय : खा. इम्तियाज जलील

नशेच्या गोळ्यांचा गोरखधंदा करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करावे - खासदार इम्तियाज जलील

पोलीस आयुक्ताकडे केली मागणी; नशेखोरांना काही पोलीस कर्मचारी अभय देत असल्याचा संशय

औरंगाबाद : शहरातील वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी आणि अल्पवयीन मुले व तरुणाईचे जीवन उध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी नशेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी थेट पोलीस आयुक्त निखिल गुप्ता याना त्याच्या  मार्गदर्शनात विशेष पथक स्थापन करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.  
          खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले कि, औरंगाबाद शहरातील अनेक अल्पवयीन मुले व तरुणाई नशेच्या आहारी गेल्याने मागील काही दिवसापासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून किरकोळ कारणावरून हत्या हि झालेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून शहरात वाढलेली गुंडगिरी आणि गुन्हेविषयक घटनांमागे नशेखोरांचे प्रमाण जास्त असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहेत. नशेखोरी मुळे शहराचा गुन्हेगारीचा आलेख तेजीत वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आधी नशेबाजांवर लगाम घालणे अत्यावश्यक झालेले आहे.
          औरंगाबाद शहरात विविध गल्ल्यामध्ये औषध विक्रेत्याकडून  नशेखोरीच्या गोळ्या मिळत असल्याचे अनेकदा माध्यमामधून प्रसारित झालेले आहे. शहरातील अनेक भागात छुप्या मार्गाने काही टोळ्या आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गल्लीबोळातील अनेक औषध विक्रेत्याकडून बटण, ऑरेंज आणि किटकॅट च्या नावाखाली झोपेच्या गोळ्याचा डोस देण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. नशेच्या गोळ्या मुळे अनेक जणांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेले असून अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले.
          विशेष म्हणजे शहरातील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत नशेच्या गोळ्याच्या कारोबर मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे सुरु असून संबंधित पोलीस स्टेशन मधील काही अधिकारी व कर्मचारी यांना त्याची संपूर्ण माहिती असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही; हि बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या सोबत आर्थिक संबंध असल्याची चर्चा सुद्धा शहरात सुरु असल्याचे समजते. नशेखोरांवर, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यावर पोलिसांची वचक नसल्याने आणि संबंधित पोलीस स्टेशन काहीही कारवाई करत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता याना पत्राद्वारे कळविले.