एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे जोमाने सुरु : खासदार इम्तियाज जलील

एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे जोमाने सुरु : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद, १० नोव्हेंबर : औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या कंपन्यांना काही समाजकंटक, गुंडागर्दी व ब्लॅकमेलिंग करणारे लोक विविध मार्गाने कंपन्यांना बदनाम करुन पैसे उकळण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी देत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी थेट विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे ब्लॅकमेलिंग करणारे विरोधात उच्चस्तरीय चौकशी करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत पत्र दिले.

          औद्योगिक परिसरातील बिडकीन चितेगाव येथील एका नामवंत कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी काही जण कंपनीच्या विरोधात विविध शासकीय कागदपत्रात खाडाखोड करुन तक्रारी देत असल्याचे प्रकरण सद्यस्थितीत सुरु असतांनाच जिल्ह्यातील इतरही कंपन्यांना अशाच प्रकारे नाहकत्रास देणे सुरु असल्याचे अनेक प्रकरणे निदर्शनास येत आहे असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

          औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा, स्थानिक युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हावे या करिता जिल्हा व राज्य शासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबवुन नामवंत कंपन्यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या औद्योगिक परिसरात यावे याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  

          परंतु काही समाजकंटक, गुंडागर्दी व ब्लॅकमेलिंग करणारे लोक विविध मार्गाने कंपन्यांना बदनाम करुन पैसे उकळण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी देत असल्याचे अनेक प्रकरण निदर्शनास येत आहे. अनेक ठिकाणी तर कंपन्यांकडून पैसे उकळण्यासाठी काही गुंडांनी गँग सुध्दा बनविल्याची माहिती मिळत असल्याचे दिलेल्या पत्रात खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले आहे.