मराठा आरक्षण लढा: मुस्लिम बांधवांची साथ, जातीयवादाला नकार
 
                                मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहे. हा लढा फक्त मराठा समाजाचा नाही, तर सामाजिक न्याय आणि समतेचा आहे. या लढ्यात मराठा बांधवांनी आपली एकजूट आणि निश्चय दाखवला आहे. पण या आंदोलनाने काही महत्त्वाचे अनुभव आपल्यासमोर आणले आहेत. कोण खरंच आपल्या पाठीशी आहे? कोण फक्त राजकीय फायदा घेत आहे? आणि आपण महाराष्ट्राची खरी ओळख कशी जपणार? या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला नेहमीच मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला आहे. जेव्हा-जेव्हा मराठा समाजाने आंदोलने केली, तेव्हा-तेव्हा मुस्लिम समुदायाने त्यांना साथ दिली. आताही मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात मुस्लिम मावळे सहभागी झाले आहेत. काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आंदोलकांना पाणी पुरवलं, तर काही ठिकाणी पावसाळ्यात मशिदींमध्ये आश्रय दिला. ही माणुसकी आणि एकजूट महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीचं दर्शन घडवते. या कृतींमुळे मराठा आणि मुस्लिम समुदायातलं बंधुभावाचं नातं अधिक दृढ झालं आहे.
पण दुसरीकडे, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या काही संघटनांनी मराठा समाजाच्या या लढ्याला कधीच पाठिंबा दिला नाही. या संघटना नेहमी हिंदुत्वाच्या नावाखाली मराठा समाजाला मुस्लिमांविरुद्ध भडकवत आल्या. पण जेव्हा खरी गरज पडली, तेव्हा या संघटना किंवा त्यांच्याशी जोडलेले राजकीय पक्ष, जसं की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट, मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. या संघटनांनी मराठा समाजाला फक्त राजकीय खेळात वापरलं. त्यांनी दाखवलेलं हिंदुत्वाचं गाजर हे केवळ आपल्या भावनांचा गैरफायदा घेण्यासाठी होतं.
महाराष्ट्राची खरी ओळख छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांत आहे. शिवरायांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. फुले यांनी शिक्षण आणि समतेचा पाया रचला. शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना मांडली. आणि आंबेडकरांनी संविधानातून सामाजिक न्यायाची हमी दिली. या महान नेत्यांनी नेहमीच सर्वांना एकत्र आणण्याचा संदेश दिला. पण आज काही संघटना आणि पक्ष या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला इतर समुदायांविरुद्ध भडकवून सामाजिक तेढ निर्माण करणं हा त्यांचा डाव आहे.
मराठा समाजाने या अनुभवातून शिकावं. ज्या मुस्लिम बांधवांनी संकटात साथ दिली, त्यांच्याशी मैत्री आणि विश्वास वाढवावा. आणि ज्या संघटनांनी फक्त राजकीय फायदा घेतला, त्यांच्यापासून चार हात दूर राहावं. मराठा समाजाने आपला लढा अधिक सर्वसमावेशक करावा. मुस्लिम, दलित आणि इतर समुदायांना सोबत घेऊन सामाजिक न्यायाचा हा लढा पुढे न्यावा. आपण सर्वांनी मिळून जातीयवाद आणि कट्टरतावादाला नकार देऊया.
महाराष्ट्र हा शिवरायांचा, फुल्यांचा, शाहूंचा आणि आंबेडकरांचा आहे. इथे सर्वधर्मसमभाव आणि एकता हीच आपली खरी ताकद आहे. मराठा समाजाने आपल्या आरक्षणाच्या लढ्यातून हा संदेश पुढे नेला पाहिजे. मुस्लिम मावळ्यांनी दिलेली साथ आणि इतर समुदायांचा पाठिंबा हा आपल्या एकजुटीचं प्रतीक आहे. या एकतेला बळकट करत मराठा समाजाने आपला लढा यशस्वी करावा आणि महाराष्ट्राची खरी ओळख जपावी.
-डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि) छत्रपती संभाजीनगर.
 
                         
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                     
            
             
            
             
            
            