महापालिकेचा बाजार समितीला दणका – अवैध बांधकाम हटवण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), प्रतिनिधी:
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार्किंगच्या जागेवर अनधिकृतरित्या दुकाने (गाळे) उभारण्यात आले असल्याची तक्रार माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी महापालिकेकडे केली होती. तसेच AIMIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे युवक अध्यक्ष मोहम्मद असरार यांनीही या प्रकरणी जोरदार पाठपुरावा केला.
महापालिकेने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संबंधित बांधकामाबाबत नोटीस बजावली. नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले की, सुमारे २,०९५ चौरस मीटर जागेवर ८९ आरसीसी कॉलम्स उभारण्यात आले असून, हे बांधकाम प्लिंथ लेव्हलपर्यंत पूर्ण झाले आहे. या कॉलम्सची उंची सुमारे ३ मीटर असून, बांधकाम भक्कम करण्यात येत आहे.
हे संपूर्ण बांधकाम कोणतीही परवानगी न घेता सुरू करण्यात आले असून, नियोजित आराखड्याच्या बाहेर आहे. तसेच हे बांधकाम शासकीय रस्त्यालगत व नाल्याच्या हद्दीत असल्याची शक्यता असल्याने ते अवैध व अनधिकृत असल्याचे स्पष्ट करून महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावली होती.
या नोटीसमध्ये ७ दिवसांत लेखी उत्तर द्यावे, अन्यथा महापालिकेकडून हे बांधकाम पाडले जाईल, असा इशाराही दिला होता. मात्र दिलेल्या मुदतीत बांधकाम न हटवल्याने महापालिकेने आता २४ तासांची अंतिम मुदत देत कडक भूमिका घेतली आहे.
महापालिकेने बाजार समितीच्या सभापती व सचिव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,
“रेखांकन स्वीकृतीनुसार बांधकाम न करता पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करून गाळे उभारले आहेत. हे अनधिकृत बांधकाम २४ तासांत स्वतःहून हटवावे, अन्यथा महापालिकेकडून हे काम कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात येईल आणि त्याचा खर्च बाजार समितीकडून वसूल केला जाईल.”
दरम्यान, AIMIMचे युवक अध्यक्ष मोहम्मद असरार यांनी महापालिकेवर निशाणा साधताना म्हटले की,
“गरिबांचे घर पाडणाऱ्या महापालिकेला जर हे बांधकाम पाडण्याची ताकद नसेल, तर आम्हाला लेखी द्यावे, आम्ही हे बांधकाम स्वतः पाडून दाखवू.”
सध्या तरी, बाजार समितीने महापालिकेच्या नोटीसमधील मुद्द्यांवर कुठलाही खुलासा दिलेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत महापालिका काय पाऊल उचलते आणि बाजार समितीची भूमिका काय असते, याकडे व्यापारी वर्गाचेही लक्ष लागले आहे.