भारतीयांना मुस्लिम राष्ट्रात सुरक्षित वाटत असल्याने दुबईत प्रचंड प्रमाणात घर खरेदी : अन् इकडे बहुसंख्य हिंदूंच्या देशात अतिशय तणावाच्या तरी ही शांततेत बकरी ईद साजरी...!

भारतीयांना मुस्लिम राष्ट्रात सुरक्षित वाटत असल्याने दुबईत प्रचंड प्रमाणात घर खरेदी : अन् इकडे बहुसंख्य हिंदूंच्या देशात अतिशय तणावाच्या तरी ही शांततेत बकरी ईद साजरी...!

देशातील १४ % टक्के मुस्लिमामुळे ८०% टक्के हिंदुना खतरा निर्माण झाल्याचा खोटा प्रचार करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप हिंदूंना मूर्ख बनवित आहे. आपली ब्राह्मणी व्यवस्था समस्त हिंदू समाजावर लादण्यासाठी ” हिंदू राष्ट्र व हिंदुत्व ” हे या फॅसिस्ट शक्तींच्या कट कारस्थानाचा एक भाग आहे. जर हिंदूंना मुसलमानापासून खरच धोका असता तर ४० लाख भारतीय रोजगार व पैसे कमविण्यासाठी दुबई व अन्य मुस्लिम राष्ट्रात गेले नसते. गेले तर त्यांना असुरक्षित वाटले असते. पण असे काही होताना दिसत नाही. त्याशिवाय सुमारे ३५,००० हजार भारतीयांनी दुबईत घरे ही खरेदी केली आहेत. मुस्लिम राष्ट्रात सुरक्षित वाटत असल्याने ही घर खरेदी दिवसेदिवस वाढत आहे. घर खरेदी करणाऱ्यांमध्ये अंबानी, अदानी या मोदींच्या उद्योगपती मित्रांसोबत संघ, भाजपच्या अनेक नेत्यांचा ही समावेश आहे. मुस्लिम राष्ट्रात त्यांना अतिशय सुरक्षित वाटत आहे. त्या उलट आपल्या देशातील वातावरण आहे. मुस्लिम समाजा विषयी प्रचंड प्रमाणात गैरसमज पसरवून त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करण्यात येत आहे.  केंद्रात संघाच्या रिमोटने चालणारे मोदी सरकार आल्यापासून मुस्लिम समाज आपले सर्व सण व उत्सव भीतीच्या वातावरणात तरीही शांततेत साजरे करतो आहे. 

           काल आपला देश वगळता अन्य सर्व जगभर निर्भय व मोकळ्या वातावरणात बकरी ईद साजरी झाली.  मात्र आपल्या देशात सर्वत्र तणाव होता. बकऱ्यांची खरेदी विक्री होणाऱ्या बाजारात तणाव होता. बकऱ्यांची ने आण करणाऱ्या साऱ्या रस्त्यांवर तणाव होता. ज्या ठिकाणी कुर्बानी करणार त्या परिसरात तणाव होता. धर्मांचे ठेकेदार भगवे गमच्छे घालून या सर्व ठिकाणी तणाव व भितीचे वातावरण निर्माण करण्याचे काम करीत होते. दोन समाजातील सलोख्याचे संबंध बिघडविण्याच्या कार्याला राष्ट्रभक्ती हे नाव मोदीच्या सत्ताकाळात देण्यात आले असल्याने हे कार्य मेंदूची नसबंदी झालेले सर्व संघी राष्ट्र कार्य म्हणून करीत होते. पण या सर्व वातावरणात ही देशभरातील मुसलमानांनी इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार हा सण शांततेत साजरा केला. मुस्लिमांनी काल लाखो बकऱ्यांची कुर्बानी दिल्याने लाखो शेतकऱ्यांच्या खिशात पैसा गेला. 

    देशात सध्या हिंदू मुस्लिम हा एकच अजेंडा प्रभावीपणे राबविला जात आहे. रेल्वे प्रवासात ड्युटीवर तैनात असलेले जवान प्रवाशांना नाव विचारून मारझोड करतात. आतंकवादी ही संघ, भाजपचा हाच अजेंडा घेवून पहलगाम हल्ला घडवून आणतात. आतंकी अड्डे उध्वस्त करणाऱ्या सौफिया कुरैशी विषयी संघी धर्मांध तणाव वाढेल असाच अजेंडा राबवितात. इतकेच काय दर्गे व मशीदी खाली मंदिराचे अवशेष शोधण्यासाठी खोदकाम करण्याचा अजेंडा ही मोदी सरकार या देशात राबवित असताना सौदीमध्ये तेथील सरकारच्या मदतीने याच फॅसिस्ट मंदिर बांधत आहेत. इतकी सुरक्षितता हिंदू व हिंदू मंदिराना मुस्लिम राष्ट्रात मिळत आहे. मग केवळ 14 टक्के मुस्लिम असलेल्या आपल्या देशात 80 टक्के हिंदू खतरे में कसा काय येवू शकतो ?  संघ व भाजपच्या ज्या नेत्यांना सारेच्या सारे मुस्लिम आतंकवादी वाटतात, आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त करणारी सेनाधिकारी सौफिया कुरैशी ही आतंकवाद्यांची बहीण वाटते, असे वाटणारे सारेच जण मोका मिळताच दुबई व अन्य मुस्लिम राष्ट्रात घर खरेदी करीत आहेत. या घर खरेदीमुळे मुस्लिम राष्ट्र राहण्यासाठी अधिक सुरक्षित आहेत, असा संदेश जगभर जावू लागला असून संघ, भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचे त्यामुळे बिंग फुटत आहे.

         आज ईद -उल- अजहा हा सण (त्योहार ) भारत वगळता जगभर शांततेत साजरा झाला.मात्र बहुसंख्य हिंदू असलेल्या आपल्या देशात अनेक अडचणीवर मात करीत मुस्लिम बांधवाना हा सण साजरा करावा लागला. ईद -उल- अजहा म्हणजे बकरी ईद. बकऱ्यांची कुर्बानी देणारा सण. देशातील सर्व्हेनुसार 75 टक्के लोक हे मांसाहारी असून त्यामध्ये केवळ 14% टक्केच मुस्लिम आहेत. याचा सरळसरळ अर्थ असा आहे की, अन्य 60 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक लोक हे बिगर मुस्लिम म्हणजे हिंदू आहेत.पण संघ, भाजपसारख्या फॅसिस्ट शक्ती आणि दुहेरी राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या माफीवीर सावरकरवादी शक्ती मुसलमानांना जाणीवपूर्वक टार्गेट करीत आहेत. हे हा सण साजरा करीत असताना सर्वत्र दिसले. बकऱ्यांची खरेदी विक्री ते कुर्बानी देण्यापर्यंत हा सण अतिशय तणावाच्या वातावरणात मुस्लिम बांधवानी देशभर साजरा केला.

    सण, उत्सव कुठल्या ही धर्माचे असो, जाती व पंथाचे असो काही धर्मांध शक्तींचा धुडगूस सोडला तर शांततेच साजरे होतात. पण मोदी सरकार केंद्रात आल्यापासून या सणाच्या एक महिना अगोदरपासूनच देशभर संघ, भाजपच्या समाजकंटक गँगच्या माध्यमातून तणाव निर्माण केला जातो आहे. केंद्रात व काही राज्यात ही भाजपची सत्ता असल्याने हा तणाव, नफरत व द्वेषाचे वातावरण शासन व प्रशासनाच्या नियोजनातून तयार केले जात आहे. बकरे अथवा अन्य प्राण्याची कुर्बानी देण्याची प्रथा ही काही मुस्लिमांमध्ये नाही तर हिंदूच्या अनेक जाती, जमाती समाज घटकांमध्ये आहे. त्यावेळी अहिंसा रजेवर असते अन मुस्लिम सण आले की ड्युटीवर येते, असे का ? तर तो या फॅसिस्ट शक्तींचा हिंदू वोट बँक तयार करण्याचा अजेंडा आहे. 

     हे सण, उत्सव आजचे नाहीत, शेकडो वर्षांपासून साजरे होत आहेत. या सण व उत्सव साजरे केल्याने समाजात दुफळी निर्माण झाल्याच्या घटनांची नोंद नाही. उलट सर्व धर्माचे, जातीचे सण, उत्सव सर्वच जण एकत्र येवून नेहमीच साजरे करीत आलेले आहेत.हे सण एकमेकांना पूरक आहेत. बकरी ईदचेच पहा. कुर्बानीच्या बकऱ्यांना प्रत्येक वर्षी चांगला भाव मिळत असल्याने देशभरातील शेतकरी शेळी पालनसारखा शेतीला पूरक व्यवसाय करतो. किती ही मंदी असली तरी मुस्लिम बांधव कुर्बानीसाठी बकरे खरेदी करतातच हा विश्वास शेतकरी व व्यापाऱ्यांममध्ये असल्याने मंदीच्या काळात ही कोटींची उलाढाल होते. बकरी ईद हा सण शेतकऱ्यांसाठी त्या अर्थाने फायदा करून देणारा असल्याने शेतकरी कुठल्या ही जाती धर्माचा असला तरी तो या सणाची वाट पाहत असतो. बकरी ईदच्या काळातच मटणाच्या भावापेक्षा अधिक भावाने बकरे विकले जातात. ग्रामीण अर्थ व्यवस्थेला हातभार लावण्याचे काम हे सण व उत्सव करीत आलेले आहेत. म्हणूनच हे सण व उत्सव एका समाजाचे असले तरी ते सर्वच जण एकत्र येवून साजरे करतात. हिच या देशाची संस्कृती, परंपरा झालेली आहे. यातून सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. नेमके हेच इथल्या संघ, सावकरवरवादी व भाजपला नको असल्याने ते हे सण, उत्सव मोकळ्या व निर्भय वातावरणात साजरे होऊ देत नाहीत. पण त्यावर ही मात करून सामाजिक सलोखा निर्माण करून तो जपण्याची आणि जगण्याची कला भारतीय समाजात आहे. 

राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, 
महाराष्ट्र प्रदेश,